डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जीवनगाथा
जगाच्या पाठीवर अनेक महापुरुष जन्माला आले. त्यांनी ज्या परिस्थितीत जन्म घेतला त्या तत्कालीन परिस्थितीचे त्यांच्या जीवनावर परिणाम झाले. त्यांनी आपल्या विवेकशील बुद्धीसामर्थ्याने तत्कालीन परिस्थितीचं आवलोकन केले. त्याचा सूक्ष्म अभ्यास केला आणि विपरीत परिस्थितीला कलाटणी दिली यापैकीच एक महामानव घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर .भारतातील समाजात ज्यांना हीन समजल्या जात होत्या अशा अनेक जाती होत्या त्यांच्या स्पर्शाचा आणि सावलीचा देखील विटाळ होतो असं मानले जाई. त्यांच्यासाठी सार्वजनिक पाणवठे, देवळे, शाळा इत्यादी बंद होत्या. जेमतेम लज्जा रक्षणापुरते फाटकेतुटके कपडे यांच्या अंगावर होते. राहण्यासाठी पुरेशी जागा नाही. पोटाची खळगी भरायला पुरेसं अन्नही नाही अशा आगतिक परिस्थितीत हा अस्पृश्य वर्ग जीवाच्या आकांतानी मरण येत नाही म्हणून जगात होता. अशाच एका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाचा जन्म झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्य भारतातील महू या गावी लष्करी छावणीत झाला. रामजी व भीमाइचं ते चौदावं रत्न होतं. या दाम्पत्यांनी मोठ्या प्रेमानं त्या रत्नाच नाव भीम असं ठेवलं. भीम सहा वर्षाचा असताना त्यांच्या आईच्या वत्सल्यापासून ते मुकले. नंतर त्यांचा सांभाळ त्यांची आत्या मीराबाईने केला. साताऱ्याला एका लष्करी छावणीतील शाळेत भीमा आणि त्याचा भाऊ आनंद शिक्षण घेऊ लागले.
अस्पृश्तेच्या शापाची जाणीव भीमाला लहान वयातच होऊ लागली. बाजारात दुकानदार आई समोर कपडे दुरून का टाकतो?आपल्या वडीलाना टांगेवाल्याने टांग्यातून का उतरवायला का लावलं? आपल्याला शाळेत वेगळी वागणूक का दिली जाते? या प्रश्नांची उत्तरे भीमा हळू-हळू शोधू लागला. आपण केवळ अस्पृश्य आहोत हेच कारण त्यांच्या मुळाशी दिसून आले.
भीमाचा स्वभाव लहानपणापासूनच करारी वा जिद्दी होता. शाळेत आंबेडकर नावाचे एक शिक्षक होते.त्यांचं भीमावर जीवापाड प्रेम होत. त्यांनी शाळेच्या दप्तर मध्ये त्याचे आंबावडेकर हे नाव बदलून आंबेडकर असं केलं, हेच आडनाव नंतर कायमस्वरूपी रूढ झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शालेय शिक्षण सातारा वा नंतर मुंबईतील एलफिस्टन माध्यमिक शाळेत झालं.शाळेत उच्चवर्णीय मुलांचा भरणा होता, यामुळे येथेही अस्पृश्य म्हणू मानहानी होऊ लागली. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत-झगडत ते दरवर्षी उत्तीर्ण होत गेले. १९०६ ला भिमांनी मट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याकाळी ती एक अघटीत घटना होती, त्यामुळे सर्वत्र त्याचं कौतुक होऊ लागलं.
मट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होताच त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला . आंबेडकरांना गुरुवर्य कृष्णाजी केळूस्कर यांनी बडोदा नरेशांसामोर उभं केलं.
सयाजीराव गायकवाडांनी आंबेडकरांना विविध प्रश्न विचारले आणि आंबेडकरांनी समाधानकारक उत्तरे दिली. बडोदा सरकारची २५ रुपयाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. एलफिस्टन महाविद्यालयातून बी.ए. परीक्षा उत्तीर्ण होताच ऋणमुक्ती साठी बडोदा संस्थानात नोकरीत रूज झाले. अस्पृश्याच्या भुताने तेथेहि त्यांचा पाठलाग केला. याच काळात वडील रामजी यांचे निधन झाले आंबेडकरांचा एकुलता एक आधारही गमावला.
बडोदे सरकारनं चार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही यात समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९१३ ते १९१६ या काळात कोलंबिया विद्यापीठात विद्यार्जन करीत होते. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, राजकारण इत्यादी विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. अवघ्या तीनच वर्षात त्यांनी एम. ए. पी.एच.डी. आणि डॉक्टर्स ऑफ फिलोसोफी पदव्या मिळवल्या.प्राचीन भारतातील व्यापार आणि भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाट हे प्रबंध सादर केले याच काळात त्यांना वाचनाचा छंद जडला. त्यांनी जवळजवळ २ हजार पुस्तके खरेदी केली.
अमेरिकेतील ज्ञानार्जन संपवून ते मायदेशी परतले. महार जातीचा एक तरुण परदेशात जाऊन शिक्षण क्षेत्रात उज्वल यश प्राप्त करून आला याचं सयाजीराव महाराजांना कौतुक वाटत होत. ते आंबेडकरानां बडोदा संस्थानाचे अर्थमंत्री म्हणून नेमणार पण हाताखालच्या लोकांचा विरोध झला आणि आंबेडकराना लष्करी कार्यवाहक म्हणून नेमलं. इग्लंडला जाऊन बरीसटरीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा म्हणून आंबेडकर पैशांची जमवाजम करू लागले. आंबेडकरानी सिडनहम कालेजात प्रोफेसर म्हणून काम केलं. आपले प्रभावी व्यक्तिमत्व, प्रखर बुद्धिमत्ता आणि शिकवण्याची हातोटी यामुळे ते विद्यार्थ्यांचे आवडते प्रोफेसर झाले. मात्र अस्पृश्यांचा प्रश्न हात्यांच्या समोरील मुलभूत प्रश्न होता. १९२० ला प्रोफेसर्कीचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले. आतिशय कठीण परिस्थितीत दिवसरात्र परीश्रम घेऊन त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘प्रोब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध सदर करून १९२३ ला ‘डॉक्टर ऑफ सायन्स हि पदवी मिळविली.
स्वताच्या प्रपंच्यापेक्षा आपल्या अस्पृश्य बांधवांच्या प्रपंच्याकडे त्यांचे अधिक लक्ष होतं. म्हणूनच समाजकाम करण्याकरिता भरपूर वेळ मिळावा यासाठी इंग्लंडवरून परतल्यावर वकिलीचा व्यवसाय स्वीकारला. बहिष्कृत समाजाच्या प्रगतीसाठी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ निर्माण केली. महाड येथील चवदार तळ्याचा संग्राम आणि काळाराम मंदिर प्रवेश करून त्यांनी इतिहासावर आमित आस ठसा उमटविला.
१२ नोव्हेंबर १९३०, गोलमेज परिषदेत आंबेडकरानी अत्यंत तेजस्वी,सडेतोड,खणखणीत,विद्वत्तापूर्ण आणि वक्तृत्वपूर्ण भाषणाने उपस्थितांना थक्क केलं. अस्पृश्यांचे दु:ख आणि त्यांच्या मुक्या वेदना जगाच्या वेशीवर टांगण्याची महत्वपूर्ण भूमिका त्यांनी पार पडली.
जातीय निवाड्याद्वरा अस्पृश्यांसाठी स्वातंत्र्य प्रतिनिधित्वाची मागणी आंबेडकरानी केली.यातच गांधीजींशी त्यांचा तात्विक संघर्ष झाला.गांधीजी येरवडा जेलमध्ये उपोषणाला बसले.शेवटी डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात समेत म्हणून पुणे करार झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या दृष्टीने आतिशय महत्वाची कामगिरी केली, ती म्हणजे ‘भारतीय संविधानाची निर्मिती होय. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर गठीत करण्यात आलेल्या घटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते.आतिशय परिश्रम घेऊन सर्वांगसुंदर आशी घटना त्यांनी देशाला बहाल केली. डॉ. आंबेडकरानी अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुकनायक,बहिष्कृत भारत,समता,जनता आणि प्रबुद्धभारात हि नियतकालिके सुरु केली. स्वातंत्र्य,समता आणि बंधुता तीन तत्वांवर त्यांचा भर होता. डॉ. आंबेडकरानी धार्मिक विचारमंथनातून १४ ऑक्टोंबर १९५६ ला आपल्या अस्पृश्य बांधवांसोबत सामुदायिक धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला. थोड्याच कालावधीत ६ डिसेंबर १९५६ ला त्यांचा महापारीनिर्वाण झालं. डॉ. आंबेडकरांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईत जमा झाला होता.
भारतातील सर्व प्रकारच्या दुष्ठ रूढीशी लढून, बुद्धीवादि समान संकेत निर्माण करण्यासाठी,विषम समाज रचना मोडून,समतेवर आधारलेली समाजरचना निर्माण करण्यासाठी व स्वाभिमान शून्य आणि महत्त्वाकांक्षा शून्य स्थितीप्रत कोट्यावधी नेणाऱ्या परिस्थितीशी सतत झुंज ख्रेळून,त्यांना स्वयंप्रकाशित महत्त्वाकांक्षी बनवून परिपूर्णतेचे जीव मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेल्या महामार्गाने खडतर यातनांतून जीवनक्रम कंठीत नवा, आधुनिक भारत व खऱ्या बंधुभावावर आधारलेला मानव समाज निर्माण करण्यासाठी आज पुन्हा त्यांचा आदर्श नव्या पिढीने घेण्याची आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment