Pages

Saturday, 11 April 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सबलीकरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सबलीकरण

आपल्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत विझू न देता आपल्या जागृत सद्सद्विवेकबुद्धीद्वारे आपले हक्क, जबाबदार्‍या व कर्तव्य यांचं भान ठेवायला हवं. निरर्थक रुढी, परंपरा व उत्सवांचा गुलाम न बनता मनात विवेकाची ज्योत सतत तेवत ठेवायला हवी. अशी ओजस्वी शिकवण देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
परवाच्या दिवशी माझा मित्र दिनेश आणि मी बोलत बसलो होतो. बोलता बोलता तो सहज म्हणाला, ‘‘खरंच आपण किती नशिबवान आहोत ना रे!’’ मी म्हटलं ‘‘का रे?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आम्हाला आज माणसाप्रमाणे जगता येते. यापूर्वीच्या आपल्या पिढ्यांच्या जीवनाचे वर्णन मी अनेक पुस्तकांच्यामध्ये वाचतो. किती घाणेरडे आणि क्रूर असे जीवन आपण जगत होतो. आमचेच पूर्वज गळ्यात मडके, पाठीला खराटा बांधून चालत होते. आमची सावली, आमचे बोलणे, चालणे, राहणे, कपडे घालणे म्हणजे या मनुवाद्यांना विटाळ वाटत होता. शी किती दीन जीवन जगल्या आपल्या पिढ्या! बाबासाहेब जन्माला आले नसते तर अजूनी किती पिढ्या, किती राजहंस या मनुच्या चक्रात मारले गेले असते याची कल्पनाही करवत नाही.’’ मी म्हणालो, ‘‘खरंय तुझं मित्रा खरंच बाबासाहेब जन्मले नसते तर आज जे जिकडे तिकडे पोपटासारखे बोलत आहेत, त्यांना अस्तित्वच मिळालं नसतं.’’ यावर दिनेश म्हणाला, ‘‘अरे ते सोडच, आम्हाला शत्रू म्हणून वाईटच वागणूक मिळत होती. परंतु समाजात अस्तित्वात असणार्‍या सर्व जातीतील स्त्रियांची किती वाईट आणि दयनीय अवस्था होती माहित आहे तुला? खूप वाईट अवस्था होती. मनुस्मृतीमध्ये स्त्री म्हणजे पापाची खाण असं त्या हरामखोर मनुने लिहून ठेवल्यामुळे आमच्याच बहिणी आमच्यासाठी शत्रू होत्या. बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलाचा कायदा जर तयार केला नसता तर, आजही अनेक कर्तृत्ववान स्त्रिया रांधा, वाढा, उष्टी काढा यातच संपून गेल्या असत्या.’’ दिनेश हे बोलला तेव्हा माझं डोकं अगदी सुन्न झालं. मी विचार करू लागलो. इतिहासात लिहिलेली स्त्रीवर्णने, स्त्री जीवन आठवण्याचा प्रयत्न करू लागलो.....
आपल्या भारत देशात प्रत्येक व्यक्तीला त्याचा स्वत:चा धर्म पाळण्याचा मुलभूत अधिकार आज जरी राज्य घटनेने दिला असला तरी आपल्या भारताला पूर्वीपासून ओळखलं जाते ते हिंदुस्थान म्हणून आणि या हिंदुस्थानात हिंदु धर्माची घाणेरडी व बंधनकारक तत्त्वे माणसाच्या कृती उक्ती ठरवतात. माणसाच्या जगण्या मरण्याच्या अधिकारावरसुद्धा या धर्मातील काही तत्त्वे अंमलबजावणी करतात. हिंदू धर्मातील आदर्श अशा ‘मनुस्मृती’ या ग्रंथाने शूद्र व स्त्रियांना कोणताही अधिकार दिला नव्हता. त्यामुळे या लोकांची वर्षानुवर्षे पिळवणूक, शोषण होत आहे. याच धर्मग्रंथाला प्रमाण मानणार्‍या लोकांनी ‘स्त्रीला चित्रामध्ये सुद्धा पाहू नये’ असा दंडक घालून दिला. त्यामुळे स्त्रीदर्शन अशुभ मानले जाऊ लागले. स्त्री हा आपल्या जीवनाचा, आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे व तिचा माणूस म्हणून विचार झाला पाहिजे. हा विचार नष्ट झाला या उलट स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू आहे, असा विचार आपल्या संस्कृतीत रुजला. त्यामुळे मुलं निर्माण करणारी मशिन या भावनेनं तिच्याकडे पाहण्याची बुद्धी या मूर्ख धर्मग्रंथांनी दिली. त्यामुळे स्त्रीचं अनेक वर्षे शोषण झालं. तिच्यावर अनेक अन्याय, अत्याचार झाले. कुठे न्याय मागण्यात जागाही ठेेवली नाही. स्त्री म्हणजे दावणीला बांधलेले जनावर असते. त्याने मालकाची फक्त सेवा करायची. मालक कोण आहे? याचा विचार करावयाचा नाही. गुलामाप्रमाणे आपण उपाशी राहून मालकांना खूष ठेवणे एवढेच काम स्त्री जन्माचे आहे असे हिंदू धर्मातील अनेक ग्रंथांमध्ये लिहून ठेवले गेले. परिणामी समाजामध्ये स्त्रीला कमी महत्त्व दिले गेले. तिचा जन्म म्हणजे मागच्या जन्मीचे पाप समजले जाऊ लागले.
या जाचक बंधनामुळे कधी काळी आपल्याकडे मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती. हे लोक विसरून गेले. आज त्याचे अस्तित्व भाषेतील काही शब्दांच्यामुळे पुन्हा ध्यानात येऊ लागले आहे. म्हणजे कुटुंबात आईला प्रमुख स्थान, तिच्या विचारांना मान, तिचे निर्णय महत्त्वाचे, लग्न झाल्यानंतर मुलांनी मुलीच्या घरी नांदावयास जाणे इ. बायकोची, तिच्या घरच्यांची मनोभावे प्रामाणिक सेवा करावी. अशी मातृसत्ताक कुटुंबपद्धती आपल्या भारतात होती. परंतु आपल्या संस्कृतीचा चुकीचा अर्थ समजून सांगणार्‍यांनी आपल्या बळाच्या सहाय्याने मातृसत्ताक कुटुंबपद्धतीचा र्‍हास केला आणि पितृसत्ताक कुटुंबपद्धती आणली. त्यामुळे स्त्रीला कुटुंबामध्ये दुय्यमत्व देण्यात आले. तिच्या जन्माला अशुभ मानले जाऊ लागले. त्यामुळे तिचे सबलीकरण होण्याऐवजी दुर्बलीकरणच झाले.
१८३३ साली सार्वजनिक शिक्षणाचा कायदा जरी इंग्रजांनी केला असला तरी उच्चवर्णीय समाजातील लोक हे शिक्षण तळागाळातील दलित, शूद्र, अतिशूद्र स्त्रियांच्यापर्यंत पोहचविण्यास तयार होत नव्हते. या उलट शुद्रांनी व कुणब्यांनी शिकून काय शेतात नांगर हाकायचेच ना? या मानसिकतेचे होते. या बरोबर माझी बहीण, माझी आई, माझी बायको शिकली तर माझ्या ताटात छोट्या छोट्या अळ्या होतील. अशी आपली पितृसत्ताक कुटुंबपद्धतीची मानसिकता मनुस्मृतीतील विचाराने करून दिली होती. परंतु महात्मा फुले नावाच्या महामानवाने हा समज मोडून आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन समाजातील अनेक अज्ञानी स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर ही प्रगती हळूहळू होतच राहिली.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री पद मिळविण्याचा मान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मिळाला. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळाने बाबासाहेबांच्यावर भारतासाठी लोकशाही प्रधान राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी टाकली. ही जबाबदारी त्यांनी अगदी चोखपणे पार पाडली. सलग दोन वर्षे रात्रंदिवस जगातील सर्व राज्यघटनांचा अतिशय बारकाईने अभ्यास करून ही राज्यघटना लिहिली. ती लिहितांना भारतातील जातीव्यवस्था, तिची कडक बंधने त्यामुळे नुकसान झालेले समाज, त्यांच्या कैक पिढ्या यांचा उद्धार व्हावा, त्यांना मुख्य प्रवाहात घेता यावे म्हणून घटनात्मक कायदे केले. त्यांच्यासाठी संपूर्ण राज्यकारभारात तेहत्तीस टक्के आरक्षण मिळावे यासाठी हिंदू कोडबिल सादर केले. दलित व स्त्रियांना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा सर्व पातळ्यांवर समानता मिळावी. कुणीही कुणालाही तो हलक्या जातीचा म्हणून कमी लेखू नये, तसेच ती स्त्री आहे म्हणून कमी मानू नये. निसर्गाने प्रत्येक माणसाला दिलेला मेंदू ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा वापर देशप्रगतीसाठी व्हावा असे वाटत असेल तर समता गरजेची आहे. बाबासाहेबांनी स्त्रीच्या सर्वांगिण उन्नतीसाठी घटनेत अशा अनेक तरतुदी करून ठेवल्या आहेत.
त्यामुळे आजच्या स्त्रिया शिक्षण घेऊन स्वाभिमानाने जीवन जगताना दिसतात. आज पंतप्रधान, राष्ट्रपतीसारख्या उच्च पदावर स्त्रिया मोठ्या दिमाखानं मिरवताना दिसतात. याबरोबरच गावची सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, आमदार, खासदार, लोकसभा अध्यक्ष इतकेच नव्हे तर संपूर्ण देश चालविण्याची क्षमता असल्याचे स्त्रियांनी सिद्ध केले आहे. स्त्रीसुद्धा पुरुषासारखी माणूसच आहे. तिलाही मन, भावना, दु:ख, वेदना, आत्मक्लेश, आनंद असतो. ती फक्त भोगदासी नसते. तर ती कर्तृत्ववान माणूस असते. हे बाबासाहेबांनी ओळखले होते. म्हणून राज्यघटनेत त्यांनी प्रगतीचे कायदे करून ठेवले आहेत. परंतु राज्यघटना देशाला लागू करून पन्नास वर्ष पूर्ण झाली तरी ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्यामध्ये स्त्रीला तेहत्तीस टक्के आरक्षण असावे ही मागणी बहुमताने मान्य होऊ शकत नाही. यासारखे दु:ख कोणते नाही.
अशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून, आपल्या लेखणीच्या सहाय्याने तसेच वेगवेगळे कायदे करून स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्न केले. कारण त्यांनी ज्या भगवान गौतम बुद्धांना गुरु मानले होते. त्यांच्या धर्मात स्त्री पुरुष समता याला अनन्यसाधारण महत्त्व होते. म्हणून माणसाची ओळख त्याची जात किंवा लिंग बघून न करता त्याची कर्तबगारी बघून करावी या पद्धतीचे विचार त्यांनी मांडले आहेत. व त्यामुळेच आज स्त्री सक्षम झालेली आपल्याला दिसते.
संदर्भ ग्रंथ सूची
१. दलित साहित्य वेदना व विद्रोह - डॉ. भालचंद्र फडके.
२. निळी पहाट - प्रा. रा. ग. जाधव
३. दलित साहित्य प्रवाह व प्रतिक्रिया - गो. म. कुलकर्णी
४. आंबेडकरी जाणीवांची आत्मप्रत्ययी कविता - डॉ. गंगाधर पानतावणे
५. निळी क्षितिजे - प्रा. रा. ग. जाधव
६. आंबेडकरी चळवळीचे अंतरंग - अर्जुन डांगळे.
----
प्रदीप एकनाथ कांबळे
निढोरी, ता. कागल, जि. कोल्हापूर.
चलभाष - ८५५०९५०८२५

No comments:

Post a Comment