रिपब्लिकन ऐक्याचे ‘पहिले पाढे...’
सुरेश भुसारी
रिपब्लिकन पक्षाच्या एकीकरणाची आवई पुन्हा एकदा उठली आहे. माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांनी रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न नुकताच नागपुरात केला. यापूर्वी रिपब्लिकन एकीकरणाचे ‘संगीत नाटक’ राज्यातील जनतेने अनेकदा अनुभवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्राला अनुसरून रिपब्लिकन नेते याअगोदरही एकत्र आले. कधी राजकीय सोयीसाठी, तर कधी जनतेच्या रेट्यामुळे त्यांना एकत्र यावे लागले. डॉ. आंबेडकरांवर असलेल्या निष्ठेमुळे हे घडले; परंतु वैयक्तिक स्वार्थापुढे ही निष्ठा सतत पातळ होत गेल्याने यापूर्वी झालेले एकत्रीकरणाचे प्रयोग अपयशी ठरले. यातून ना रिपब्लिकन पक्षाची शक्ती वाढली, ना चळवळीला बळ मिळाले. ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ ही त्रिसूत्री डॉ. आंबेडकरांनी दलित जनतेला दिली. या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्यात रिपब्लिकन नेत्यांना यश आले नाही. किंबहुना यासाठी कसोशीने प्रयत्न केल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये दिसलेले नाही. दलित चळवळ व रिपब्लिकन नेत्यांच्या भूमिका वेळोवेळी बदलल्याने नेतृत्वावर रिपब्लिकन जनतेचा विश्वास उरलेला नाही. एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचे दहावर आमदार निवडून येत. राज्यातील ४० ते ५० मतदारसंघांत दलित मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतात. ही शक्ती रिपब्लिकन नेत्यांच्या व्यक्तिगत आकांक्षा व मतलबामुळे सातत्याने क्षीण होत गेली. ही गठ्ठा मते विविध गटांत विखुरली. दुसरीकडे अलीकडेच व्हाया आंध्र प्रदेश महाराष्ट्रात मुसंडी मारलेल्या ‘एमआयएम’चे दोन आमदार विधानसभेत निवडून आले. रिपब्लिकन नेत्यांना कधी काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ तर कधी भाजप-शिवसेनेच्या तुकड्यावर राजकीय गुजराण करावी लागत असेल, तर यापेक्षा दयनीय स्थिती कोणती असू शकेल? या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या एकत्रीकरणाचा नवा फार्स ‘पहिले पाढे पंचावन्न’ याच गटात मोडणारा आहे.
No comments:
Post a Comment