Pages

Friday, 10 April 2015

आंबेडकरी चळवळः समज आणि गैरसमज

आंबेडकरी चळवळः समज आणि गैरसमज


आंबेडकरवाद हे एक गतीशील तत्त्वज्ञान बनण्याऐवजी त्यास साचलेपण प्राप्त होत आहे, हा खरा धोका आहे. ही कोंडी फोडून संवैधानिक नितीमत्ता मानणारा माणूस घडविणे आणि सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष करून जनमत संघटीत करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या लोकशाही क्रांतीला चिरस्थायी करण्याचा राजमार्ग आहे.
आंबेडकरी चळवळ निघालीय कुठं? या शीर्षकाचा नवशक्तिच्या दिनांक 20 मे 2012 च्या रविवार पुरवणीतील लेख वाचल्यानंतर चळवळीच्या अनुषंगाने बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु, लेख वाचून मात्र भ्रमनिरास झाला. लेखाच्या शीर्षकावरुन निळे यांनी चळवळीचे वस्तुनिष्ठ आकलन, विश्लेषण आणि निदान करून चळवळ गतीमान कशी हाईल, या अनुषंगाने दिशादर्शन केले असावे, असा समज होतो. मात्र, प्रत्यक्षात निळे यांनी पारंपारिक, पद्धतीप्रमाणे रिपब्लिकन नेत्यांच्या दोषांची जंत्री करण्यापलीकडे फारसे काही केलेले नाही. त्यांनी लेखाच्या शीर्षकाद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या लिखाणातून मिळत नाहीत.
एनसीईआरटीच्या अकरावीच्या राज्यशास्त्राच्या `इंडियन कॉन्स्टिटय़ूटशन ऍट वर्क’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून गदारोळ उडालेला आहे. या पुस्तकाच्या निर्मिती मंडळाचे प्रमुख सल्लागार डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयाची रिपब्लिकन पँथर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यामुळे संपूर्ण आंबेडकरी चळवळ भर समुद्रात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे भरकटत चालली आहे, असे निरीक्षण भगवान निळे यांनी नोंदविले आहे. आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना आत्मपरिक्षणाचे वावडे आहे, एकूणच आंबेडकरी चळवळीकडे नेमका कार्यक्रम नाही, त्यामुळे आंदोलनाला दिशा नाही, विविध विषयांचे जाणकार असलेल्या तसेच समाजशास्त्र आणि विचारवंतांची आंबेडकरी चळवळीत वानवा आहे, आंबेडकरी चळवळीत सर्वत्र अंधारच दिसतो आहे, आंबेडकरी चळवळीने जातीबाहेरच्या प्रश्नांसाठी लढा दिल्याची उदाहरणे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तरी आढळत नाहीत, कोणत्याच आंबेडकरी पक्षाकडे अथवा संघटनेकडे विचारपूर्वक लिहिलेला जाहीरनामा नाही, पक्षाची घटना नाही, अशीही निरीक्षणे निळे यांनी नोंदविली आहेत.
काय आहे आंबेडकरी चळवळ?
आंबेडकरी चळवळीवर लिहिताना बहुतेक सर्वच लेखक, पत्रकार, तथाकथित विचारवंत रिपब्लिकन पक्ष म्हणजेच आंबेडकरी चळवळ मानतात आणि रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाचे दोष म्हणजे आंबेडकरी चळवळीचे दोष असा शिक्का मारून मोकळे होतात. खरेच रिपब्लिकन पक्ष म्हणजेच आंबेडकरी चळवळ आहे काय? रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाचे दोष म्हणजे एकूणच आंबेडकरी चळवळीचे दोष ठरतात काय? माझ्या मते, हा प्रकार साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार आहे. आंबेडकरी चळवळीला रिपब्लिकन पक्षाच्या चौकटीत कोंबणे हा वैचारिक व्यभिचार आहे. रिपब्लिकन पक्ष हा आंबेडकरी चळवळीच्या अनेक अंगापैकी एक अंग आहे. आंबेडकरी चळवळीत कला, साहित्य, नाटय़, गायक-शाहीर-कव्वाली ही सांस्कृतिक अंगे आहेत. धम्मविषयक कार्य करणार्या विविध संस्था, संघटना, बुद्धविहारे, धम्मसंगोष्टी महिला मंडळे ही धार्मिक अंगे आहेत. याशिवाय स्वतंत्रपणे समाजकार्य करणारे समाजसेवक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, कर्मचारी, अधिकारी आहेत. प्रबोधनाचे कार्य करणार्या बामसेफ, एम्बस इत्यादींसारख्या कॅडरबेस संघटना, विविध सरकारी-नीमसरकारी आस्थापनातील कर्मचार्यांच्या संघटना, अन्याय-अत्याचाराविरुद्ध ऍडव्होकेसी करणार्या एनसीडीएचआर, आयएसडीएन, नॅकडोर, नवसर्जन, समता सैनिक दल यासारख्या संघटना, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ दलित स्टडीज, दलित इंटलेक्ट कलेक्टिव्ह यासारख्या संशोधन संस्था तसेच आंबेडकरी तत्त्वविचारावर अधिष्ठित असलेली विविध दैनिके आणि नियतकालिके ही सर्व आंबेडकरी चळवळीचाच भाग आहेत. या विशाल भागाला दुर्लक्षित करुन केवळ रिपब्ल्किन पक्ष म्हणजे आंबेडकरी चळवळ असा भ्रम उभा करणे म्हणजे आंबेडकरी अनुयायांची दिशाभूल करणे होय, असे आम्ही समजतो.
कोणतीही चळवळ म्हटली की, विशिष्ट तत्त्वज्ञानावर अधिष्ठित असलेला त्या चळवळीचा स्वतःचा असा एक ध्येयसंकल्प असावा लागतो. त्या ध्येयसंकल्पाच्या पूर्ततेसाठी विविध साधने निर्माण करावी लागतात. रिपब्लिकन पक्षाला तसेच आंबेडकरी तत्त्वज्ञान प्रमाण मानणार्या इतर राजकीय पक्षांना फारतर अशा विविध साधनांपैकी एक साधन मानता येईल. चळवळीच्या ध्येयसंकल्पाच्या पूर्ततेसाठी निर्माण करण्यात आलेल्या साधनांपैकी एखादे साधन अपेक्षित कार्यसिद्धी करू शकले नाही म्हणून संपूर्ण चळवळच भरकटली आहे, हेलकावे खात आहे, असे म्हणणे म्हणजे चळवळीचा ऊर्जात्रोत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तत्त्वज्ञानात्मक आधार चुकीचा होता, असे समाजमनावर बिंबविणे होय. आंबेडकरी चळवळीचे विरोधक असलेली वृत्तपत्रे, लेखक, पत्रकार, तथाकथित विचारवंत अशी दिशाभूल निरंतर करीत आली आहेत. आंबेडकरी अनुयायांना निराशावादी बनविणे हा यामागील उद्देश असतो. भगवान निळे यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारानेही या आंबेडकर विरोधकांच्या सूरात सूर मिसळावा हे आश्चर्यकारक वाटते. (हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या निराशावादाचा शोध घेण्यासाठी `फस्टेशन’ या नावाने लिहिलेले प्रकरण पहावे- लेखन आणि भाषणे, खंड 12, पृष्ठ 733-735) आंबेडकरी चळवळी संपली आहे, भरकटली आहे, असा धोशा लावणार्यांनी आंबेडकरी चळवळ काय आहे? हे समजूनच घेतलेले नाही, असा आमचा आरोप आहे. `सर्वसामान्य माणसांनी विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी केलेला संघटित प्रयत्न म्हणजे चळवळ’ अशी चळवळीची ऍकॅडमिक व्याख्या आहे. आंबेडकरी चळवळीचे स्वरूप या व्याख्येपेक्षा कितीतरी अधिक व्यापक आहे. आंबेडकरी चळवळीचे तात्त्विक अधिष्ठान बुद्धतत्त्वज्ञान आहे. बुद्धांनी व्यक्तीमध्ये मानसिक बदल घडवून आणून स्वतःसोबतच इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणारा माणूस निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सूत्र कायम ठेऊन संविधानाच्या माध्यमातून हिंदुस्थानी व्यक्तींची मानसिक बैठक भारतीय बनविणे आणि सामाजिक आणि आर्थिक न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करणे, हा सर्वोच्च ध्येयसंकल्प देशवासीयांपुढे ठेवला आहे. म्हणून `भारतीय माणूस घडविणे आणि या माणसाकडून संविधानाधिष्ठित राष्ट्रनिर्माण करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी विविध व्यक्ती, संस्था आणि राज्य यांनी संयुक्तरित्या केलेला प्रयत्न म्हणजे आंबेडकरी चळवळ’ अशी आंबेडकरी चळवळीची व्याख्या केली पाहिजे. राष्ट्रनिर्माणाच्या या चळवळीला एका जातीच्या चौकटीत आणि एका राज्याच्या सीमारेषेत कोंबण्याचा आटोकाट प्रयत्न या देशातील सर्व प्रसारमाध्यमे, पत्रकार, लेखक आणि तथाकथित विचारवंत करीत असतात. राष्ट्रनिर्माणाच्या या चळवळीला हाणून पाडण्यासाठी प्रतिक्रियावादी शक्ती `राष्ट्रीय पुनर्निर्माण’ हा सर्वोच्च ध्येयसंकल्प देशवासीयांपुढे ठेवत आहेत. त्यासाठी ते `धर्मप्रवण व्यक्तिमानस’ आणि `धर्माधिष्ठित समाजरचना’ निर्माण करण्याची चळवळ राबवित आहेत. हे समजून घेतल्यास केवळ रिपब्लिकन पक्ष म्हणजे आंबेडकरी चळवळ आहे, अशी दिशाभूल करण्यामागचा प्रतिक्रियावादी शक्तींचा डाव लक्षात येईल. आंबेडकरी चळवळ भरकटली आहे काय? ज्यावेळी एखादी व्यक्ती, एखादा समाजघटक प्रचलित आणि समाजमान्य विवेकी मूल्यांना व प्रमाणकांना नाकारून विपथगामी होतो तेव्हा ती व्यक्ती अथवा समाजघटक भरकटला, असे म्हटले जाऊ शकते. या निकषानुसार तपासून पाहिल्यास आंबेडकरी चळवळ भरकटली आहे, असे म्हणता येईल काय? आंबेडकरी चळवळीने प्रमाणभूत मानलेली मुख्य तत्त्वे भारतीय संविधानात नमूद असलेली न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि व्यक्तिसन्मान ही आहेत. आंबेडकरी चळवळीतल्या कोणत्याही संघटनेने या मूल्यांना तिलांजली देऊन विषमताधारित समाजनिर्मितीसाठी प्रयत्न चालविले आहेत काय? धर्मप्रवण व्यक्तिमानस म्हणजेच विचार न करणारा अविवेकी माणूस तयार व्हावा, यासाठी आंबेडकरी म्हणविणार्या एखाद्या संघटनेने, पक्षाने, संस्थेने कार्यक्रम आखला आहे काय? संविधानात नमूद धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला तिलांजली देऊन धर्माधिष्ठित समाजरचना अस्तित्वात आणण्यासाठी आंबेडकरवादी म्हणविणार्या कोणीतरी मोहीम चालविली आहे काय? असे जर नसेल तर आंबेडकरी चळवळ भरकटली आहे, असा दावा कोणत्या आधारावर केला जातो? आंबेडकरी तत्त्वज्ञान प्रमाण मानणार्या भारतातील एका राज्यातील राजकीय पक्षाला निवडणुकीत अपेक्षित यश प्राप्त झाले नाही अथवा काहींनी निषेध नोंदविण्यासाठी तोडफोड केली, हा आंबेडकरी चळवळ भरकटल्याचा निकष होऊ शकत नाही. आंबेडकरी चळवळीकडे नेमका कार्यक्रम नाही, हा केवळ अपप्रचार आहे. भारतामध्ये कोणत्याही रक्तपाताशिवाय आर्थिक  आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा आंबेडकरी चळवळीचा प्रमुख कार्यक्रम आहे. सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर केवळ आंबेडकरी पक्ष-संघटनानीच लढे दिले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली 1964 साली करण्यात आलेले भूमिहीनांचे जेलभरो आंदोलन हे केवळ एका जातीच्या प्रश्नासाठी करण्यात आलेले नव्हते. यामध्ये विविध जातीधर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता. विदर्भात दादासाहेब, ना. ह. कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली बिडी कामगारांच्या प्रश्नासाठी प्रचंड मोठे आंदोलन यशस्वीरीत्या करण्यात आले. इतर मागासवर्गीयांना नोकर्यांमध्ये राखीव जागा मिळाव्यात, यासाठी मंडल आयोग लागू करावा म्हणून केवळ आंबेडकरी चळवळीतील पक्ष – संघटनांनी आंदोलन केले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी नाग विदर्भ आंदोलन समितीच्या नावाने बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे व इतर रिपब्लिकन नेत्यांनी इतर जातीच्या नेत्यांना एकत्र करुन आंदोलन केले. डोक्यावरुन मैला वाहून नेण्याच्या अघोरी प्रथेविरुद्ध सर्वप्रथम आंबेडकरी संघटनांनी कर्नाटकात आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची व्याप्ती आता देशभर पसरली आहे. आंध्रमध्ये दारुबंदीसाठी सर्वप्रथम आंबेडकरवादी संघटनांनी आंदोलन सुरू केले. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. मात्र, आंबेडकरी चळवळीला आणि या चळवळीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक एका जातीचे नेते ठरविण्यासाठी त्यांचे क्रांतिकारी योगदान मनुवादी प्रसारमाध्यमांनी लोकांपुढे येऊ दिलेले नाही. ही वस्तुस्थिती विचारात न घेता आंबेडकरी चळवळीने जातीबाहेरच्या प्रश्नांसाठी लढा दिलेला नाही, असे म्हणणे म्हणजे आंबेडकरी चळवळीला बदनाम करणे होय. आंबेडकरी चळवळीत विविध विषयाचे जाणकार असलेल्या तसेच समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतांची वानवा आहे, हे म्हणणे तर हास्यास्पद आहे. भारतात नॅनोटेक्नॉलॉजीचे जागतिक किर्तीचे एकमेव तज्ञ डॉ. एन. एस. गजभिये आहेत. सध्या सागर विद्यापीठाचे कुलगुरु असलेले डॉ. गजभिये भारताच्या नॅशनल साईन्टिफिक ऍडव्हाजरी कमिटीचे सदस्य आहेत. एवढय़ा उच्चशिक्षित व्यक्तीला हरिजन म्हणून डॉ. हरिसिंह गौर या स्वातंत्र्य सैनिकाच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यापासून त्यांना उच्चवर्णीयांनी रोखले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डॉ. विवेक कुमार समाजशास्त्राचे जागतिक कीर्तीचे विचारवंत आहेत. दिल्ली विद्यापीठात डॉ. अलोणे प्रसिध्द थिओलॉजिस्ट आहेत. डॉ. सुखदेव थोरात, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव , मुंबई विद्यापीठातील डॉ. जोगंदड, नागपूर विद्यापीठातील डॉ. भाऊ लोखंडे, डॉ. आगलावे असे एकाहून एक समाजशास्त्रज्ञ, विचारवंत, साहित्यिक, अभियंते, डॉक्टर्स, आंबेडकरी चळवळीत आहेत. यादीच करायची झाल्यास ही जागा अपुरी पडेल. तरीही आंबेडकरी चळवळीत विविध विषयाच्या जाणकारांची आणि विचारवंतांची वानवा आहे, असे कोणी म्हणत असतील तर ते त्यांचे अज्ञान आहे, असेच म्हणावे लागेल. कोणत्याही आंबेडकरी पक्षाकडे अथवा संघटनेकडे स्वतःचा जाहिरनामा, पक्षाची घटना नाही, हे भगवान निळे यांचे विधानसुध्दा असेच अज्ञानमूलक आहे. बहुजन समाज पक्ष हा देशातील तिसर्या क्रमांकाचा मान्यताप्राप्त पक्ष आहे. या पक्षाची घटना निवडणूक आयोगाने मान्य करुनच पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. ऑल इंडिया मूलनिवासी बहुजन समाज सेंट्रल संघ (एम्बस) या संघटनेने तर `आंबेडकरवाद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय आराखडा’ या नावाचा 400 पृष्ठांचा जाहीरनामा लिखित स्वरुपात तयार करुन त्याबरहुकूम संघटना बांधणीचा प्रयत्न चालविला आहे. महाराष्ट्रातील पी. आर. आंबेडकर, कर्नाटकातील एम. सी. राज, तामीळनाडूतील डॉ. जयहरन यांनी आंबेडकरवादाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देऊन कार्यकर्ते तयार करण्यासाठी अल्प व दिर्घ मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम स्थापित केले आहेत. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. परंतु, भगवान निळे यांनी राष्ट्रीय स्तरावरील आंबेडकरी चळवळ विचारात घेतलेली नाही, असे दिसते. आंबेडकरी चळवळीत सर्व काही आलबेल आहे काय? उपरोक्त प्रश्नाचे उत्तर नाही, असे आहे. आंबेडकरी चळवळ भरकटलेली नसून ती अरिष्टात सापडली आहे, असे म्हणता येईल. अरिष्ट म्हणजे काय? तर आहे ती स्थिती अधिकाधिक बिघडत जाणे आणि कोणत्याही उपायांनी त्या स्थितीत सुधारणा न होणे. सोप्या भाषेत याला चळवळीच्या विघटनाची प्रक्रिया सुरु होणे, असे म्हणता येईल. एखाद्या चळवळीच्या विघटनाची प्रक्रिया सुरु झाली आणि विघटनास रोखण्याचे यशस्वी प्रयत्न झाले नाहीत तर चळवळीचे पतन अटळ असते. या स्थितीत चळवळीत सहभागी असलेल्या सदस्यांकडे दोनच पर्याय असतात. एकतर परिस्थितीला शरण जाऊन गुलामी पत्करणे किंवा वास्तवाचा मुकाबला करुन परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष करणे. यापैकी कोणता पर्याय स्वीकारायचा, हे प्रत्येकाच्या नैतिकतेवर, विवेकबुध्दीवर आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असते.
चळवळीचे विघटन रोखून चळवळीला पुन्हा गतीमान करण्यासाठी स्वयंपरिक्षण आणि स्वयंसमीक्षण गरजेचे असते. भगवान निळे यांच्या म्हणण्यानुसार, रिपब्लिकन नेत्यांना आत्मपरिक्षण आणि आत्मटीकेचे वावडे आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या बाबतीत हे कदाचित खरेही असेल; परंतु आंबेडकरी चळवळीच्या बाबतीत मात्र हे खरे नाही. स्वयंपरीक्षण आणि स्वयंसमीक्षण करण्यासंदर्भात बुद्धाने वैशिष्टयपूर्ण पद्धत सांगितली आहे. बुद्ध म्हणतात `भिक्खूंनो, एखाद्याने बुद्धाला, धम्माला, संघाला अथवा तुम्हाला वाईट म्हटले, शिवी दिली तर विचलित न होता सर्वप्रथम आपले स्वतःचे अवलोकन करा. आपले खरोखरच चुकले आहे का यासाठी स्वतःची वर्तणूक तपासून पहा. चुकले असेल तर शिवी देणार्यास साधुवाद द्या! कारण शिवी देणाराने तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची संधी दिली आहे. तुमचे चुकले नसेल तर त्याचे अज्ञान दूर करा. यासाठी तो तयार नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करा’. बुद्धाच्या या उपदेशानुसार आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणार्यांनी आपले स्वयंमूल्यमापन आणि स्वयंसमीक्षण करणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळीत असे स्वयंपरीक्षण आणि स्वयंसमीक्षण मान्यवर कांशिरामजींनी केले आणि आंबेडकरी चळवळीला देशभरात गतीमान केल्याचा इतिहास अगदी ताजा आहे. सद्यस्थितीतही असे प्रयत्न विविध पातळीवर होत आहेत. यातूनच पुन्हा एकदा समग्र आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करणारा नवा कर्णधार उदयास येउ शकेल.
क्रांती कोण पथे?
क्रांती म्हणजे काय? तर, समाजातील विविध समाजघटकांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परस्परसंबंधात बदल होणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्याद्वारे हे बदल घडवून आणले आहेत. याचाच अर्थ भारतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही क्रांती घडवून आणली आहे. या देशाच्या इतिहासात बुद्धानंतर झालेली ही महत्तम क्रांती होय. प्रश्न आहे या क्रांतीला सहभागी लोकशाहीत विकसित करून चिरस्थायी करण्याचा. क्रांतीमुळे समाजाचे घटक असलेल्या व्यक्तींच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक संबंधामध्ये झालेले बदल नवीन नीतिमूल्यांची मागणी करतात. या बदलांना अनुरुप अशी नीतिमूल्ये समाजात रुजविण्याचा प्रयत्न क्रांत्युत्तर काळात झाला नाही तर मात्र क्रांती फसते आणि प्रतिक्रांतीला सुरुवात होते. भारतामध्ये राष्ट्रीय पुनर्निर्माणवादी शक्तींनी संवैधानिक नीतिमूल्ये समाजात रुजू नयेत यासाठी प्रचंड ताकद लावली आहे. भारतीय समाजात संविधानविरोधी मूल्यांना सर्व स्तरावर उत्तेजन दिले जात आहे. यामुळे भारतातील लोकशाही क्रांतीचा विध्वंस होऊन धर्मनियंत्रित लोकशाही या स्वरूपात प्रतिक्रांती होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या लोकशाही क्रांतीचे सर्वांत मोठे लाभार्थी अनुसूचित जाती- जमाती, अन्य मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक असल्यामुळे ही प्रतिक्रांती रोखण्याचे काम त्यांनाच करावे लागणार आहे. त्यातही या क्रांतीची समज आंबेडकरी बौद्धांना इतरांपेक्षा अधिक असल्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी मोठी आहे. मात्र, आंबेडकरी बौद्ध या क्रांतीचे वैज्ञानिक विश्लेषण करुन या क्रांतीला पूर्णत्वास नेण्याऐवजी पोथीनिष्ठ धर्मवादी आणि दुराग्रही होत चालले आहेत. यामुळे आंबेडकरवाद हे एक गतीशील तत्वज्ञान बनण्याऐवजी त्यास साचलेपण प्राप्त होत आहे, हा खरा धोका आहे. ही कोंडी फोडून संवैधानिक नीतिमत्ता मानणारा माणूस घडविणे आणि सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष करून जनमत संघटित करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या लोकशाही क्रांतीला चिरस्थायी करण्याचा राजमार्ग आहे.

No comments:

Post a Comment