Pages

Friday, 10 April 2015

महापुरुषांचा पराभव’ कधीच होत नसतो.

महापुरुषांचा पराभव’ कधीच होत नसतो.



महापुरुषांचा पराभव... आंबेडकरी जनतेचे मानसीक खच्चिकरण करण्यासाठी  भारतीय माध्यमे व पत्रकारीता नेहमीच सज्ज असते. मग कशातही व कसलाही तत्वज्ञान उगारुन आंबेडकरी समाजाची दिशाभूक करण्यात या दोन्ही संस्था/व्यवस्था कायम आघाडीवर राहिल्या आहेत. आता जोडीला इंटरनेटही दाखल झाले दिसते. जनार्दन वाघमारे लिखीत ’महापुरुषांचा पराभव’ नावाच्या  शालेय पुस्तकातील धड्याचे संदर्भ आजकाल आंतरजालावर महापूर आल्यागत वाहत आहेत. आज जयंतीच्या निमित्ताने तर अनेकानी या धडयातले संदर्भ देऊन आंबेडकरी जनतेच्या वागणूकीमुळे कसा बाबासाहेबांचा पराजय होतो आहे वगैरे डोस पाजणे चालू केले.  जनार्दन वाघमा-यांचा तो धडा मी वाचला नसल्यामुळे त्या धड्यावर कमेंट करणे अयोग्य ठरेल पण त्यातला एक संदर्भ वापरला जात आहे तो म्हणजे"महापुरुषांचा पराजय त्यांचे अनुयायीच करत असतात”याचा समाचार घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या महान तत्वज्ञानाच्या नि आदर्श जिवन पद्धतीच्या विसंगत वागून तमाम आंबेडकरी समाज बाबासाहेबांचा पराभव करत आहे अशी जी मांडणी केली जात आहे, ती आंबेडकरी माणसाचे मनोधैर्य खचविण्याच्या उद्देशाने चालविलेले षडयंत्र आहे. बाबासाहेबांचे उदात्त विचार, पराकोटीची सामाजीक बांधिकली नि दैनंदीन जिवनातील वागणूकीत नैतिकतेचा आग्रह... याच्याशी आंबेडकरी जनतेने केलेली प्रतारणा म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयायानी केलेला बाबासाहेबांचा पराभव आहे... असा एकूण युक्तीवाद दिसतो.
यावर माझा प्रश्न आहे की बाबासाहेबांचा पराजय अनुयायी कसे काय करु शकतात? अनुयायी जर नीट वागत नसतील तर त्यात अनुयायांचा पराभव आहे... बाबासाहेबांचा कसं काय? बाबासाहेबानी त्यांच्या वेळी सामाजीक क्रांतीचा एक विचार मांडला, लढा दिला व तो जिंकला सुद्धा. त्यांचे अनुयायी म्हणून तो विचार पुढे नेताना आज जर आम्ही कमी पडत असलो तर तो आमचा पराजय आहे... बाबासाहेबांचा नाही. पण आमच्या पराजयाला बाबासाहेबांचे पराजय असे म्हणण्याचा खोडसाडपणा का केला जातो तेच कळेना.
समजा तुमच्या मास्तरानी जीव ओतून तुम्हाला शिकवले, अभ्यास करायला सांगितले पण तुमच्या बेफिकीरीमुळे जर परिक्षेत तुम्ही नापास झालात तर  नापास तुम्ही की तुमचा मास्तर? अजुन खोलाता जाऊन बोलायचे म्हटल्यास एका वर्गात शंभर विद्यार्थी असतील व मास्तर सगळ्याना सारखेच धडे देत आहे. पण त्यातली फक्त ५० पास होतात व ५० नापास. मग यात मास्तराचा दोष की अभ्यास न करणा-या त्या पन्नास आळशी ढोण्यांचा? खरंतर मास्तरानी त्याच्या वयात स्वकर्तूत्वाने ही परिक्षा कधीच पास केलेली आहे. आता तो नव्या विद्यार्थ्यांचा मास्तर आहे... त्यामुळे मास्तराला पास नापासाचे निकषच गैरलाऊ आहेत. अगदी तसच बाबासाहेबानी स्वत:चे आचरण अत्यंत उच्च दर्जाचे नि समाजाला आदर्श घालून देणारे ठेवले होते. आता त्यांचा विद्यार्थी म्हणून काही लोकं आज कमी पडत असतील तर तो विध्यार्थ्यांचा/ अनुयायाचा पराजय ठरतो... बाबासाहेबांचा अजिबात नाही. या देशात बाबासाहेबांचा पराजय पाहण्यासाठी आतूर असलेला समाज कायम निराश नि हताश होत गेला... कारण बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक लढा मोठ्या फरकानी जिंकला होता. बाबासाहेबांच्या हयातीत त्याना पराजीत करण्याचे न जमल्यामुळे त्यांच्या नापास अनुयायांकडे बोट दाखवून बाबासाहेब पराजीत झाल्याची बोंब मारणे म्हणजे सडक्या वृत्तीचे प्रदर्शन होय. 
ज्या लोकांकडे बोट दाखवून ही सडकी डोकी बाबासाहेबांचा पराभव झाला म्हणतात... ती लोकं तमाम उच्चशिक्षीत आंबेड्करी जनतेकडे बोट दाखवून एका शब्दानी कधी बाबासाहेबांची स्तूती करत नाहीत. IAS,IPS, IFS,IRS होऊन उच्चस्थानी विराजमान अधिकारी पासून आयटी,फायनान्स, मार्केटींग क्षेत्रात दैदिप्यमान कार्य केलेले तमाम आंबेडकरी तरुण आहेत... पण यातील एकाही गोष्टीत याना बाबासाहेबांच्या अनुयायांची भरारी दिसत नाही. काही हरकत नाही... तुम्ही आजुन किती दिवस अनुल्लेखानी मारणार? आता बाबासाहेबांच्या विचाराला बांधील असणारी नव्या दमाची पिढी उभी होत असून आज ना उद्या याची दखल घ्यावीच लागेल हे याद राखा. दर महिन्याला भरणारी धार्मिक शिबीरे, उन्हाळी व दिवाळी सुट्टीत होणारे बौद्ध बालसंस्कार शिबीरे, प्रत्येक गावातून उभी राहणारी विहारं व तळागळात जाऊन अखंडपणे चालविला जाणारा आंबेडकरी विचार... याच्या जोडीला चळवळीला वाहिलेली अनेक वृत्तपत्रं, मासिके, त्रैमासीके अन कित्येक प्रकाशन संस्था ज्या बाबासाहेबांचे कार्य चालवितात... यातील एकही गोष्ट याना उल्लेखनीय वाटत नाही. का बरं? कारण या गोष्टी लिहल्यास आंबेडकरी समाजाला प्रोत्साहन मिळेल, आम्हाला हुरूप येईल. बाबासाहेबांची लेकरं अजुन जोमाने कामाला लागतील... ते होऊ दयायचे नाही. बास! मग काय... काही दारुड्या लोकांकडे बोट दाखवून बाबासाहेबांचा पराभव म्हणत ओरडा करायचा... बाबासाहेबांच्या पराभवाचं हे लॉजीक कोणाच्या डोक्यातून उगवलं माहित नाही.. पण आहे भन्नाट. आमच्या समाजातिल दारुडे हे परिस्थीतीचे मारे आहेत... त्यांचा नाईलाज होता... ज्या परिस्थीतीत त्यांचा जन्म झाला, त्यांचे जडणघडण झाले हा त्याचा परिणाम आहे. पण त्याच दारुड्याच्या घरातली पोरं शिक्षणाची कास धरत आहेत... हवं तर एखाद्या दारुड्याच्या घरी जाऊन तपासून पहा. मला बौद्ध समाजातील एक दारुडा दाखवा ज्याला हे सांगावं लागतं की बाबारे तुझ्या पोराला शाळेत घाल. अपवादलाही सापडणार नाही याची खात्री आहे. कुठून आली एवढी सजगता माझ्या दारुड्या बांधवांत? बाबासाहेबामुंळे आली. माझ्या समाजातील समस्त दारुड्यांचा नीट अभ्यास केल्यास कालच्या दारुड्यापेक्षा आजचा दारुडा नक्कीच बदलेला दिसेल. बाबासाहेबांच्या विचाराकडे सरकलेला दिसेल ही ग्राउंड लेवलवरची परिस्थीती आहे. तरी सुद्धा कळते पण वळत नाही ही परिस्थीती मोठ्या प्रमाणात आढळेल. यात आमचा दोष आहे... आमच्या बापाचा नाही.    
माझ्या बापानी मला जगण्याचे धडे नि वागण्याचे नियम शिकविले... ते शिकविण्यात त्यानी कसूर केला असता तर एकदा हे मान्यही केले असते. पण शिकविण्यात कुठलाच कसूर नसताना जर मी चांगला वागत नसेन तर तो पराजय बापाचा कसा काय? मास्तरानी २+२=५ शिकवले व विद्यार्थ्यानी तसे लिहल्यास मास्तर नापास म्हणायल हरकत नाही. पण मास्तरानी त्यांची जबाबदारी चोख बजावत २+२=४ शिकवलेल पण विद्यार्थ्यानी २+२=५ असा घोळ घातला... यात मास्तराचा काय दोष? बाबासाहेब आमचे गुरु म्हणून शिकविण्यात कुठेच कमी पडलेले नाहीत. जर कुणी कमी पडला असेल तर आम्ही... शिकणारा विद्यार्थी, बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आम्हीच कमी पडलो. मग तो पराजय आमचा ठरयला हवा. पण काही दिड शहाणे मात्र तो पराजय बाबासाहेबांच्या माथी मारायला निघालेत. अन दाखला काय देतात तर अनुयायामुळे म्हणे पराजय... कसं काय बुवा?
बाबासाहेबनी माझ्यासाठी निवडलेला मार्ग सर्वोत्तम होता व आहे. त्यानी माझ्या भविष्याची तरतूद म्हणून धम्मरुपी भांडवल दिलं. आज ते वापरण्यात माझा घोळ होत असेल तर तो माझा दोष आहे. बाबासाहेबांचे तत्वज्ञान जर मला कळत नसेल... किंवा कळूनही वळत नसेल तर मी बाबासाहेबांचा गुन्हेगार आहे. यासाठी मी बापाला दोष देणार नाही आणि ईतरानिही देऊ नये... माझ्या चुकीसाठी फक्त मलाच आरोपी ठरवावे. मी सुद्धा मुकाट्यानी माझा दोष मान्य करायला तयार आहे. पण याच्या उलट  जर माझ्या हातून काही चांगले घडत असेल तर ते बाबासाहेबांच्या कृपेमुळे हे मात्र लक्षात ठेवावे. माझ्या हातून घडणा-या प्रत्येक चांगल्या कार्याची प्रेरणा बाबासाहेब आहेत. त्यांच्या शिकवणूकिचा परिपाक म्हणून अशा सर्व चांगल्या कार्याचे श्रेय बाबासाहेबानाच जाते. पण माझ्या हातून जर चूक होत असल्यास मात्र तो माझा गुन्हा आहे. हा फरक त्या सर्व त्रैयस्थानी लक्षात घ्यावा जे माझ्या दोषाचे खापर बाबासाहेबांवर फोडू पाहात आहेत.
बाबासाहेबांचे अनुयायी जे काही करत आहेत त्यात बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहभाग नसून त्यानी दिलेल्या उदात्त तत्वज्ञातून प्रत्येक माणूस त्याच्या कुवती प्रमाणे अनुकरण करत असतो. अनुयायांचे आकलन नि उपलब्ध परिस्थीती याचा तो परिपाक असतो. त्यामुळे आनुयायांच्या हातून काही कमी-जास्त घडत असल्यास त्याची १००% जबाबदारी अनुयायाची असून पराभव हा अनुयायांचाच असतो. महापुरुषांचे विचार प्रेरणास्थानी असतात. रचनात्मक कार्यात ते दिशादर्शक ठरतात. त्या विचारांचे अनुकरण करणारे चूकत असल्यास विचार मांडणा-या महापुरुषाला दोषी धरता येणार नाही. कठोर परिश्रमातून व पराकोटीच्या त्यागातून काही लोकं महापुरुषत्वास पोहचलेले असतात. त्यांच्या हयातीत त्यानी स्वत: अनेक जय-पराजय पाहिलेले असतात. पण ज्या दिवशी ते जातात तिथून पुढे त्यांचा पराजयही थांबतो. यापुढे पराजय झालाच तर तो त्यांच्या अनुयायांचा होतो. अन ज्या ज्या वेळी त्यांच्या प्रेरणेतून एखादे उदात्त कार्य घडते तेंव्हा तेंव्हा त्या महापुरुषाचा विजय होत असतो... फक्त विजय..!
बाबासाहेबांच्या लेकरांच्या हातून जर काही चुका होत असतील तर तो अनुयायांचा पराजय आहे... बाबासाहेबांचा नाही. कारण महापुरुषांचा पराजय कधीच होत नसतो.


जयंतीच्या शुभेच्छा

-जयभीम. 

2 comments:

  1. "महापुरुषांचा पराजय त्यांचे अनुयायीच करत असतात" ह्याचा अर्थ असा होतो की अनुयायी त्या महापुरुषाला समजून घेण्यास अपयशी होतात . ह्या अपयशाचे कारण अनुयायांच्या चुका आणि मर्यादा असतात , महापुरुषांच्या नाही . अनुयायी त्यांच्या महापुरुषाची शिकवण , त्यांचे विचार , त्यांचे आचरण समजून घेण्यात कमी पडतात त्यामुळे पुढील काळात त्या महापुरुषांचे विचार समाजात दूषित होऊन चुकीच्या अर्थाने पसरतात . महापुरुषांचे विचार आपापल्या सोईनुसार अनुयायी वापरतात , गैरसोईचे विचार वगळले जातात किंवा दुर्लक्षिले जातात . अश्या मुळे महापुरुषांच्या विचारा बाबत संभ्रम निर्माण होतो , आणि संभ्रम निर्माण झाला की अविश्वास आणि संशय चोर पावलांनी मनात शिरतो .
    सर्व महापुरुषांना सुद्धा काही मर्यादा असतात त्या मर्यादांसकट त्यांचा स्वीकार केला पाहिजे . महापुरुषांकडून सुद्धा काही चुका होतात , ते कुढलीही चूक केली नाही म्हणून महापुरुष नाही झाले , तर त्यांनी त्यांच्या चुका मान्य केल्या आणि त्या सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला म्हणून ते महापुरुष झालेत .
    तुम्ही जो तर्क दिला आहे की विद्यार्थ्यांच्या अपयशाला शिक्षक जवाबदार असू शकत नाहीत हा तर्क चुकीचा आहे , कारण विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकाचे यश सामावलेले असते .

    ReplyDelete
  2. एखाद्याचं मुल चुकीचं वागत असेल तर बापावर खापर फुटतं.

    ReplyDelete